मुंबई : इंदू मिलच्या जागेवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. कारण मुंबईतील इंदू मिलची जागा राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळाकडून महाराष्ट्र सरकारकडे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया शनिवारी, २५ मार्च रोजी पूर्ण झाली. त्यामुळे स्मारक उभारणीच्या कामाला गती मिळणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे सांगितले. ‘महान्यूज’ने त्या संदर्भातील वृत्त दिले आहे.
त्या वेळी मुख्यमंत्री म्हणाले, ‘आमच्या सरकारने इंदू मिलच्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारण्याच्या कामाला वेग दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. अवघ्या तीन दिवसांत पंतप्रधानांनी इंदू मिलची जागा महाराष्ट्र सरकारकडे हस्तांतरित करण्यासाठी तत्त्वत: मंजुरी दिली. त्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळानेही या संदर्भात निर्णय घेतला. दरम्यानच्या काळात राज्य सरकारतर्फे स्मारकाचे काम सुरू करण्यात आले. त्यासाठी निविदा प्रक्रिया झाली. पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले; मात्र इंदू मिलची जागा कायदेशीररीत्या महाराष्ट्र सरकारच्या नावावर हस्तांतरित झालेली नव्हती.’
‘या संदर्भात शनिवारी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांच्यासोबत विधानमंडळात बैठक झाली. त्या वेळी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले उपस्थित होते. इंदू मिलची जागा महाराष्ट्र सरकारला हस्तांतरित करण्यासंदर्भातील कागदपत्रे या बैठकीत देण्यात आली,’ असेही फडणवीस म्हणाले. त्यांनी मोदी आणि आठवले यांचे आभार मानले.
केंद्रीय मंत्रिमंडळाने तीन ऑगस्ट २०१६ रोजी बैठकीत इंदू मिलची जागा राज्य सरकारकडे हस्तांतरित करण्यासाठी मंजुरी दिली होती. आता प्रत्यक्ष ताबा मिळाल्याने निविदा प्रक्रिया पूर्ण करून स्मारकाचे काम तातडीने पूर्ण करण्यात येणार आहे, असे सांगण्यात आले.